तिशीनंतरच्या वयात 14 टक्के शहरी, तर 18 टक्के ग्रामीण लोकांचे सांधे दुखत असतात. काही सर्वेक्षणांमध्ये तर याहीपेक्षा जास्त प्रमाण सापडले आहे. हजारात एखाद्या मुलाचे सांधे दुखतात. जीर्ण आजारांपैकी पहिले पाच म्हणजे हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग आणि संधिवात. यापैकी वेदना आणि अपंगत्व निर्माण करणारा सर्वांत महत्त्वाचा रोग म्हणजे संधिवात. संधिवाताविषयी जागरुकता कमी आणि गैरसमजुती जास्त. त्यामुळे आजार बळावत जातो आणि पांगळेपणा येतो. लवकर निदान झाले आणि योग्य उपचार केले तर संधिवाताचे नियंत्रण करणे शक्य आहे.संधी म्हणजे सांधा. शरीरात असे सुमारे 200 सांधे आहेत. त्यापैकी अर्धेअधिक मणक्यात असतात. सांध्याचे मुख्य कार्य म्हणजे हालचाल. सांधा दुखणे आणि हालचालीत बाधा येणे याला आपण संधिवात म्हणतो. यालाच इंग्रजीत ऱ्हुमॅटिझम म्हणतात. संधिवात हा आजार नसून, लक्षण आहे. संधिवात हे लक्षण असणारे सुमारे शंभरएक आजार आहेत. त्याच्या अचूक निदानाचे आणि औषधोपचाराचे वैद्यकशास्त्र म्हणजे ऱ्हुमॅटॉलॉजी.संधिवाताचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. झिजेचे आणि सुजेचे. वयोमानाने सांध्यांची कूर्चा झिजते. मार लागणे, सांध्याची शस्त्रक्रिया, आमवात, स्थूलता, व्यवसायामुळे सांध्याचा अतिवापर, व्यायामाच्या अभावाने स्नायूंचा अशक्तपणा, अशी याची मुख्य कारणे. मानेचे, तसेच कंबरेचे मणके (स्पॉंडिलोसिस) आणि गुडघा, खांदा, घोटा, तसेच बोटांच्या सांध्यांत अशी झीज होते. झिजेमुळे हे सांधे दुखतात व हळूहळू अकार्यक्षम बनतात. काम केल्यानंतर (उदा.- जिने चढताना गुडघे दुखणे, दिवसभर कॉम्प्युटरवर बसून संध्याकाळी मान किंवा कंबर दुखणे) हे झिजेच्या संधिवाताचे मुख्य लक्षण. हळूहळू दुखणे वाढून सांधा सतत, तसेच रात्रीही दुखत राहतो. कालांतराने "हार्टफेल'सारखा सांधाही "फेल' होतो.सुजेचे संधिवात हे जास्त गंभीर. पंचवीसेक आजारांत सांध्यांना सूज येते. त्यालाच आयुर्वेदात आमवात म्हटले आहे. लुपस, स्क्लेरोडर्मा, संग्रहणी, सारकॉइड, कर्करोग, चिकुनगुनिया, क्षय, एड्स अशा अनेक आजारांत सांध्यांना सूज येते. संधिवाती आमवातात हातपायांची बोटे, तसेच मनगट आणि घोट्याचे असे अनेक सांधे सुजतात व दुखतात. सकाळी उठल्यावर किंवा विश्रांतीनंतर सांधे कडक राहतात. हलवता येत नाहीत आणि हालचालीनंतर काहीसे सैल होतात. सुजेमुळे सांधे आतून खराब होतात आणि कधीही न भरून येणारी हानी होते. बोटे आणि इतर सांधे वेडेवाकडे होतात. ताप येणे, डोळे कोरडे पडणे, थकवा, भूक न लागणे अशी लक्षणेही सोबत असतात. रक्तवाहिन्या, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि हृदय अशा अनेक अवयवांवरील परिणामांमुळे आमवातात रुग्णांचे आयुष्य सुमारे सात वर्षांनी कमी होते. वेदना आणि व्यंग यामुळे मनाला उदासीनता येते ती वेगळीच.आमवात बहुधा तरुण किंवा मध्यम वयाच्या स्त्रियांना होतो. तरुण मुलींना लग्नाचा प्रश्न, घरातील कर्ती स्त्री अपंग झाली की संसाराचा गाडा हाकण्याचा प्रश्न... अनेक सामाजिक समस्या आमवाताच्या अनुषंगाने येतात. औषधांचा खर्च, काम न करता आल्याने होणारे आर्थिक नुकसान हे वेगळेच. सारेच संधिवात स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असले, तरी आऊट आणि ऍन्किलोसिंग स्पॉंडिलायटिस हे पुरुषांमधले विशेष संधिवात, गाऊटचे ऍटॅक, ऍन्किलोसिंग स्पॉंडिलायटिसचे कडक कंबरेचे दुखणे, असे त्रास सहन करत हे तरुण कसेबसे आयुष्य काढत असतात. लहान मुलांना संधिवात झाला तर वाढ खुंटते आणि उभ्या आयुष्याचा प्रश्न उभा राहतो. गेल्या वीसएक वर्षांत नवी औषधे, तसेच मार्गदर्शक तत्त्वांमुळे संधिवाताच्या उपचारांमध्ये क्रांती झाली आहे. शस्त्रक्रियांचे प्रमाणही कमी झाले आहे. शिवाय एखाद्या सांध्याची शस्त्रक्रिया झाली तरी इतर अनेक सांध्यांसाठी उपचार लागतातच. लवकर निदान झाले तर योग्य उपचारांनी सांधे पूर्ववत होऊ शकतात, व्यंग टाळता येते आणि शस्त्रक्रिया लांबवता येते. त्यासाठी समाजामध्ये व डॉक्टरांमध्येही जागरुकता निर्माण होणे अत्यावश्यक आहे.
अधिक माहिती साठी हा कार्यक्रम ऐका
http://www.youtube.com/watch?v=soPrk9IAXpM